आपले कर्तव्याला न विसरावे । भगवंताचे अनुसंधान
राखावे ॥ व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे । बाकी रामावर सोपवावे ॥ कर्तव्यात
परमात्म्याचे स्मरण । यातच सिद्धीचे बीज जाण ॥ असा करावा संसार । जेणे राम न होईल दूर
॥ देहाने कर्तव्याची जागृति । त्यात ठेवावी भगवंताची स्मृति । कर्तव्यात असते मनाची
शांति ॥ कर्तव्याचा कधी न पडावा विसर । हृदयी धरावा रघुवीर ॥ ऐसे वागेल जो जनी । त्याने
जोडला चक्रपाणि ॥ उद्योगाशिवाय राहू नये । कर्तव्याला चुकू नये । पण त्यात रामाला विसरू
नये ॥ ठेवावा रामावर विश्वास । कर्तव्याची जागृति ठेवून खास ॥ देहाचा विसर पण भगवंताचे
ध्यान । हेच भक्तीचे मुख्य लक्षण ॥ देह करावा रामार्पण । स्वत:चे कर्तेपण सोडून ॥ शास्त्री
पंडित विद्वान् झाला । भगवत्पदी न रंगला । व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे ॥ भगवंतापाशी
राहावे रात्रंदिन । हाच सुखाचा उत्तम उपाय जाण ॥ रामाचे चरणी घ्यावी गति । हाच विचार
आणावा चित्ती ॥ सुटावी प्रपंचाची आस । तेथे परमात्म्याचे प्रेम खास ॥ सर्व कर्मांत
अधिष्ठान असावे देवाचे । तोच कल्याण करील साचे ॥ भले बुरे जे असेल काही । ते सोडावे
रामापायी ॥ चित्त असावे रामापायी । देहाने खुशाल संसारात राही ॥ आपण व्हावे रामार्पण
। सुखदु:खास न उरावे जाण ॥ धन्य त्याची जननी । ज्याने राम आणिला ध्यानी मनी ॥ रामावीण
दुजे काही। आता सत्य उरले नाही ॥ भाव ठेवावा चित्तात । सुखे आयुष्य घालवावे त्याचे
सान्निध्यात ॥ ज्याने जिणे केले रामार्पण । त्यासी व्यवहार हेच खरे योगसाधन ॥
‘माझे सर्व
ते रामाचे’ । मानून जगात वागणे साचे । अशास नाही कष्ट फार । मागे पुढे रघुवीर ॥ आपण
व्हावे मनाने रामाचे । राम जे करील तेच घडेल साचे ॥ चित्त ठेवावे रामापायी । दुजे मनात
न आणावे काही ॥ आता न सोडावी हरीची कास । होऊन जावे त्याचे दास ॥ दास्यत्वाचे मुख्य
लक्षण । मालकावाचून न दुसऱ्याची आठवण ॥ भगवंताचा दास झाला । जग मानत त्याला ॥ म्हणून
आपण सर्व आहो रामाचे दास। हे उरी बाळगावे खास ॥ ‘एकच जगती माझा रघुपति’ । याहून दुजा
न करावा विचार । हाच ठेवावा निर्धार ॥ भाव ठेवता रामापायी । तो कधी कमी पडू देणार नाही
॥ मनाने जावे भगवंताला शरण । जो चुकवील दु:खाचे कारण । राम माझी मातापिता । बंधु सोयरा
सखा । तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी । याहून दुजा विचार मनात न आणी ।